टाकरखेडा सरपंचांना अपहाराची रक्कम तात्काळ भरण्याची नोटिस 

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

लोकशाही दिनानिमित्ताने न्याय मिळण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीला प्राधान्य देत तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचायतच्या आर्थिक खर्चाच्या कारभारात लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात येऊन तत्कालीन महिला सरपंचासह दोन ग्रामसेवक यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडुन वसुली संदर्भात नुकतेच पत्र पाठविण्यात आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील टाकरखेडा येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच शारदा अनिल महाजन व गोकुळ महेंद्रसिंग चौधरी व त्यांच्या सरपंच कार्यकाळातील ग्रामसेवक नागनाथ विष्णु गायकवाड व दिनेश रमेश पाटील यांनी सेवेत कार्यरत असतांना संगनमताने केलेल्या सन २०१३-१४ ते २०१७-१८ दरम्यान ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाचे लेखा परिक्षण अहवालात आक्षेप घेण्यात आलेले आहेत.याबाबत पंचायत समितीच्या वतीने पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की,सदर संदर्भ जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडील ग्राप/१ /आरआर/८१४/२०२२पत्रा अन्वये आक्षेपाची पुर्तता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४० ( २ ) ( ३ ) व ( ४ ) नुसार ३ महीन्यांच्या आत करणे आवश्यक असतांना तसे केलेले नाही.तसेच पंचायतीच्या मासिक सभेत विषय क्र ७/ १व ठराव क्रमांक ७ / १ अन्वये एकुण १६६ आक्षेपांची पुर्तता बरोबर असुन स्विकृतीस वरिष्ठ कार्यालयाकडेस पाठविण्यात यावे असा ठराव टाकरखेडा ग्रामपंचायतीने केलेला असुन सदर विषय रितसर अजेंडयावर घेवुन त्यास मान्यता घेवुन पाठविणे गरजेचे असतांना तसे केलेले नाही.सदर लेखा परिक्षण आक्षेपात एकुण रूपये ५ लाख ८९ हजार २०८ इतकी वसुली झालेली असुन त्यापैकी तत्कालीन सरपंच शारदा अनिल महाजन व गोकुळ महेन्द्रसिंग चौधरी यांच्याकडून प्रत्येकी रूपये १ लाख ४७ हजार ३०२ इतकी रक्कम वसुलीस पात्र असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.सदरची रक्कम संबधीतांकडुन वसुल करून तात्काळ ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या खात्यात रितसर भरणा करून पावती संबधीतांना देवुन या संदर्भातील सविस्तर माहीती छायांकित प्रतिसह पंचायत समिती यावल कार्यालयास सादर करावी असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले असुन तसे न केल्यास आपल्या कडील लेखा परिक्षण आक्षेपाची थकीत वसुलीच्या रक्कमेची पुर्तता करण्यासाठी जमीन महसुलची थकबाकी म्हणुन धरण्यात येवुन आपल्या संपत्तीवर बोजा बसविण्याची कार्यवाही तहसीलदार यावल यांचे मार्फत करण्यात येणार असल्याचे या नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.यासंदर्भात मात्र ज्या दोन तत्कालीन ग्रामसेवकांच्या कार्यकाळात हा आर्थिक घोळ झाला आहे त्या ग्रामसेवकांना अद्यापपर्यंत कोणतीही नोटीस पाठविण्यात आली नसल्याने प्रशासनाकडुन संबधीतांना पाठीशी तर घातले जात नाही ना?असा प्रश्न तक्रारकर्ते व टाकरखेडा ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.