राष्ट्रवादीतल्या संघर्षामध्ये नवा ट्वीस्ट, राहुल नार्वेकरच्या गुगलीने कोण क्लीन बोल्ड?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या 9 आमदारांना अपात्र करण्याबाबतची नोटीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहे.

विधानसभा सचिवालयाकडे आलेल्या निवेदन आणि याचिकांचा अभ्यास केला जात आहे. त्याचं नोटिंग तयार करून माझ्यासमोर सादर केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसत असतानाच राहुल नार्वेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संघर्षात नवा ट्विस्ट आला आहे. ‘अद्याप कुठल्याही गटाने किंवा आमदाराने फूट पडल्याचं निवेदन मला दिलेलं नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकच विधिमंडळ पक्ष आहे.

जो निर्णय होईल तो याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होईल. अर्धा इकडे अर्धा तिकडे अशी परिस्थिती उद्भवल्याचं आपल्याला दिसणार नाही,’ असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

‘माझ्याकडे गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक निवेदन आली आहेत. काही आमदार आणि राजकीय पक्षांनी निवेदनं दिली आहेत, त्यात एका पेक्षा अधिक नेत्यांनी पक्षाचं नेतृत्व केल्याचा दावा केला आहे, मात्र आता खात्री करून घ्यावं लागेल की नेमका कोण नेता पक्षाचे नेतृत्व करत आहे.

हा निर्णय घेतल्यानंतर मला पुढचे निर्णय घेणं सोपं होईल,’ अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. दरम्यान आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एका सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, त्यावरही राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. न्यायालयात याचिका दाकल करणं प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, त्यावर मी कुठलीही बाधा आणू शकत नाही. संविधानाने आपल्या देशात तीन संस्था निर्माण केल्या आहेत.

कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि कायदेमंडळ या तिन्ही संस्था स्वतंत्रपणे काम करत असतात. एकमेकांच्या कामात तिन्ही संस्था हस्तक्षेप करत नाहीत. संविधानातील तरतुदींनुसार विधानसभा अध्यक्षांच्या कामात आणि कामाच्या पद्धतीने कुठलीही संस्था ढवळाढवळ करणार नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh