ट्रॅव्हल्सची दुचाकीला जबर धडक; ३ जण जागीच ठार

बुलढाणा – राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने तीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वडनेर गावाजवळ घडली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश असल्याचे समोर येत आहे.सविस्तर माहितीनुसार, वडनेर गावाजवळील दि. १५ नोव्हेंबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात जळगाव जिल्ह्यातील स्वप्निल करणकार (वय २७) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष) तर कल्याण येथील आकाश राजू आखाडे अशी मयत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.