उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिन मेळाव्यात जोरदार हल्लाबोल केला. “जे जनतेच्या मनात आहे ते मी नक्की करेन. काही लोक हॉटेलमध्ये गुप्त गाठीभेटी घेत आहेत, कारण मराठी माणूस पुन्हा एकत्र यावा हे त्यांना नको आहे. पण आम्ही काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ,” असा ठाम इशारा ठाकरे यांनी दिला.
याच वेळी त्यांनी हिंदी सक्तीवरही टीका केली. “हिंदी सक्ती करून बघा. अंगावर येणार असाल तर मी इथेच आहे. कम ऑन किल मी… पण येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. कारण तुम्ही सरळ येणार पण जाताना आडवे व्हाल,” असा कडवट इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या विधानाने सभागृहात मोठा जल्लोष झाला.
मनसेशी युतीचे संकेत
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युतीचे संकेतही दिले. “मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच आम्ही करणार. मुंबई त्यांच्या हाती देणार नाही. कोणी शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसायचा प्रयत्न केलात तर भाजपचे नाव-निशाणही पुसून टाकू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांचा पलटवार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या वर्धापन दिन मेळाव्यात याला प्रत्युत्तर दिले. “दिवस कोणाचे बदलतील सांगता येत नाही. सत्तेत असताना सगळ्यांना तुच्छ मानणारे आज युतीसाठी किती उतावळे व लाचार झाले आहेत,” असा टोला शिंदे यांनी लगावला.
“कम ऑन किल मी म्हणणाऱ्यांना सांगतो – मरे हुए को क्या मारना है? महाराष्ट्रानेच त्यांना विधानसभा निवडणुकीत पाडले आहे. मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या म्हणतात, पण फक्त नारा दिल्याने मनगटात ताकद येत नाही. वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नाही, त्यासाठी सिंहाचे काळीज लागतं,” असेही त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले.
शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुतीच्या बॅनरखाली लढवण्याचे जाहीर केले. “आता विधानसभा जिंकलो म्हणून गाफील राहायचं नाही, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावले.