प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये वारा वादळात अंगावर झाड पडल्याने म्हैस मेली होती त्यामुळे रितसर पंचनामा व कागदपत्रे सादर केली होती तरीही नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता या बाबत सर्व प्रथम जळगाव संदेश ने’ शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा? ‘या मथळ्याखाली दि. ३ जानेवारी २०२४ रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि २७ एप्रिल २०२३ रोजी या परिसराला चक्री वादळाचा तडाखा बसला होता त्यात रामचंद्र पांडुरंग धनगर यांच्या मालकीच्या एक लाख रुपये किंमत असलेल्या म्हशीच्या अंगावर झाड पडल्याने म्हैस मेली होती त्यामुळे रामचंद्र धनगर यांनी रितसर सर्व कागदपत्रे सादर केली होती तसेच तत्कालीन तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी सहकार्य केले होते परंतु त्या दिवशी झालेल्या नुकसानीचा अनेकांना लाभ मिळाला मात्र, म्हैस दगावली तरी भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. ही बातमी जळगाव संदेश ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे या बातमीची दखल घेत येथील नवनिर्वाचित तलाठी सुनिता वळवी यांनी संबंधित शेतकऱ्याला बोलवून माहिती घेतली आणि पाठपुरावा करून १५ दिवसात शेतकऱ्याला ३७५००/- (सदोतिस हजार पाचशे रुपये) चा धनादेश सुपूर्द केला. विशेष म्हणजे भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी व शेख साहेब यांनीही या बाबत तात्काळ कार्यवाही केली. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली आहे. शेतकरी रामचंद्र पांडुरंग धनगर यांना तलाठी सुनिता वळवी, भाजपाचे भालचंद्र पाटील, उपसरपंच एकनाथ सपकाळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश सपकाळे, पत्रकार जितेंद्र काटे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपोषण मागे घेतले बाबतचे पत्र शेतकरी रामचंद्र धनगर यांनी तलाठी यांच्याकडे दिले आहे.
यावेळी तलाठी सुनिता वळवी यांनी सांगितले की, नुकसान भरपाई संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे निधी असतात आणि कागदपत्रांची पूर्तता योग्य वेळेत झाली की ऊशिरा का असेना परंतु भरपाई मिळत असते असे सांगितले. तर जळगाव संदेश ने माझी समस्या मांडली नसती तर कदाचित लवकर मला भरपाई मिळाली नसती असे शेतकरी रामचंद्र पांडुरंग धनगर यांनी सांगितले.