राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दीड हजार नव्या बस तरीही प्रवाशांची संख्या २० लाखांनी घसरली; उत्पन्नावर परिणाम

राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात अलीकडेच दीड हजार नव्या बस जोडण्यात आल्या असल्या तरी यंदाच्या एप्रिल ते जून या उन्हाळी सुट्टीच्या हंगामात एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत सरासरी २० लाखांची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे महसूल मिळण्यात अपयश आले आहे.

प्रत्येक वर्षी एप्रिल ते जून हा कालावधी एसटीसाठी महत्त्वाचा मानला जातो. ग्रामीण व शहरी भागांत शाळा, कॉलेज सुट्ट्या आणि लग्नसराई यामुळे प्रवासी संख्या वाढत असते. मात्र यंदा ही संख्या घसरली असून महामंडळाचे आर्थिक उत्पन्न देखील कमी झाले आहे.

२४ जानेवारी २०२५ रोजी एसटीचे तिकीट भाडे १५ टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. त्यामुळे उत्पन्न वाढण्याची आशा व्यक्त करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात एप्रिलमध्ये उत्पन्नात केवळ ८.५ टक्के, मे महिन्यात १२.६ टक्के तर १५ जूनपर्यंत फक्त १२.५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

राज्यातील एसटीचे ३१ विभाग आणि २५१ आगारांपैकी अनेक आस्थापना तोट्यात चालल्या आहेत. ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मोठ्या विभागांमध्ये सातत्याने तोटा नोंदवला जात आहे. नफ्यात असलेल्या विभागांचे योगदानही संपूर्ण महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अपुरे पडत आहे.

तोट्यातील आगारांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा पाठवल्या जात आहेत, मात्र कौशल्य विकास, कर्मचारी समुपदेशन किंवा कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी, तिकीट दरवाढीचा अपेक्षित फायदा एसटी महामंडळाला मिळताना दिसत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ताजा खबरें