चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात उशिराने का होईना पण समाधानकारक पाऊस होत असल्याने पेरण्याही झाल्या आहेत.काही भागात पिके तरारत आहे.त्यांना खतांच्या मात्रा देणे सुरू आहे.कारण रासायनिक खतांच्या अति वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते हे खरे आहे. परंतु ही उत्पादन वाढ काही तात्पुरत्या व मर्यादीत स्वरूपाची असते.आपण उत्पादन वाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. रासायनिक खतांचा अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर दयावे लागते. साहजिकच त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते.परिणामी जमिनी कडक होऊन खारवटतात.यापुढिल काळात शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक खतांच्या वापराबाबत विचार करावा,असे मत चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु) यांनी ह्या पत्रकान्वये व्यक्त केले आहे.
रासायनिक खतांप्रमाणे किटकनाशकांच्या अतिवापराचे देखील विषारी व अनिष्ट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. शेतीतील उपद्रवकारक किटक मरतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतूही बळी पडतात. खरे तर निसर्गाने स्वतःच शेतीत अनेक गोष्टींचा समतोल साधण्याची व्यवस्था केलेली असते. रासायनिक खतांसह किटकनाशके व तणनाशके यांचाही पिकांवर व पर्यायाने आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळणे या उद्देशातून यापुढे शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक शेती/ सेंद्रीय शेती/ जैविक शेती ही संकल्पना राबविली पाहिजे,असेही आवाहन जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.
.