गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा रंगली आहे. या चर्चांना भाजप नेत्यांकडून मात्र फारसे महत्त्व देण्यात आलेले दिसत नाही. ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही, असे भाजप नेत्यांचे स्पष्ट मत आहे.
याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी उपरोधिक टीका करत मनसे व ठाकरे गटाच्या शक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. “एका पक्षाचे 20 आमदार आहेत तर दुसऱ्या पक्षाचे शून्य आमदार आहेत. आम्ही एवढे घाबरलो आहोत की झोप लागत नाहीये,” अशी उपहासात्मक टीका नितेश राणे यांनी केली होती.
त्याला प्रत्युत्तर देताना मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंच्या वैचारिक पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकास्त्र सोडले. “नितेश राणे यांना मी गांभीर्याने घेत नाही. त्यांची वैचारिक उंची म्हणजे उभे राहिले तर लवंगेएवढी आणि बसले तर विलायचीएवढी असते,” अशा शब्दांत महाजन यांनी राणेंवर हल्ला चढवला.
या टीकेनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकाश महाजनांवर पलटवार केला. “प्रकाश महाजन कोण? राजकारण, समाजकारण किंवा विधायक क्षेत्रात त्यांचे योगदान काय आहे? तोंडाचा वापर करण्याइतकीही त्यांची कुवत नाही,” असे नारायण राणे म्हणाले.
याच भाषणात नारायण राणे यांनी इशाराही दिला. “तुम्ही पुन्हा आमच्या मार्गात आलात तर योग्य मार्ग दाखवण्याचे काम मी करीन. परत बोललात तर उलट्या करायला लावेन,” असा थेट इशारा राणेंनी दिला.
मनसेही या टीकेमुळे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी राणे पिता-पुत्रांना थेट इशारा देताना म्हटले, “जर नारायण राणे यांचे राज ठाकरे यांच्याशी अतिशय जवळचे संबंध असतील तर त्यांच्या बोलघेवड्या पुत्राला थांबवण्याची जबाबदारी त्यांची आहे. महाराष्ट्र सैनिकांना धमक्या देण्याची हिंमत कोणी करू नये. आम्ही उगाच कोणाच्या काड्या करत नाही आणि काड्या करणाऱ्याला सोडत नाही.”
या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा कलगीतुरा रंगला असून ठाकरे बंधूंची युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.