आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. लवकरच या आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात निकाल देताना, आमदारांच्या अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलावली आहे.
या बैठकीमध्ये किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा घेतला जाणार आहे. लवकरच आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येण्याची देखील शक्यता आहे.
शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून या प्रकरणावर निर्णय घेतला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली. निवडणूक आयोगाकडून घटनेची प्रत मिळताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली.