लोकशाही धोक्यात असून संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देशापेक्षा स्वत:ला महान समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत. विरोधकांना धमक्या देऊन भाजपसोबत येण्यास भाग पाडले जात आहे, असा घणाघात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी चढवला. राजस्थानमधील जयपूर येथे विद्याधर नगर मैदानात आयोजित प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकावर आसूड ओढले.
पारतंत्र्याच्या अंधारात अडकलेल्या या देशात एकेकाळी आपल्या महान पूर्वजांनी कठोर संघर्षाच्या बळावर स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आता इतक्या वर्षानंतर त्या ज्योतिचा प्रकाश थोडा मंदावला असून अन्यायाचा अंधार वाढत चालला आहे. याविरुद्ध लढून न्यायाची ज्योत तेवत ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा आणि अन्यायाविरुद्ध एकजूट व्हा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
त्या पुढे म्हणाल्या की, हा देश काही मोजक्या लोकांची जहागिरी नाही. देशापेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही. आज लोकशाही धोक्यात असून संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. भाजपच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महागाईने उच्चांक गाठला आहे. रोजच्या कमाईतून खाण्यापिण्याचा खर्च भागवणेही कठीण झाले असून जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतींमुळे गृहिणींच्या अडचणी वाढल्या आहेत. परंतु आज असे नेते सत्तेवर बसले आहेत जे स्वत:ला देशापेक्षा मोठे मानतात आणि ते लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत.