जळगाव जिल्ह्यात एकूण १३७ जागांसाठी आले ६ हजार ५५७ अर्ज
जळगाव – राज्यातील तरुणाईचे वर्दीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया अडकून पडली होती. मात्र आजपासून अखेर भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईने गर्दी केली आहे. विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचे कसब दाखवले.
तरुण तरुणी चाचणीसाठी मैदानावर पोहचले असून विविध जिल्ह्यांतील एकूण १७ हजार ४७१ पदांसाठी ते प्रयत्न करणार आहेत. काही ठिकाणी पावसाने व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह कायम दिसला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहे.