आम्हाला दुसरं ताट का देता? ओबीसीतूनच आरक्षण हवं’ मनोज जरांगेंची मागणी

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रीमंडळातही मंजुरी मिळाली आहे.

पण मनोज जरांगे पाटील  मराठा समाजाला ओबीसीतूनच (OBC) आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आधी सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजवणी करण्याची मागणीही केली आहे. अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतलं कशाला, गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करायला अधिवेशन घेतलं का असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आता आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

दोघा-तिघांच्या हट्टासाठी 10 टक्के आरक्षण देण्याचं गाजर दाखवण्यात आलं आहे. पण यात मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होणार आहे. जसं ECBC चं आरक्षण टिकलं नाही, त्यानंतर चार-पाच वर्ष आंदोलनं केली. आता पुन्हा हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर पन्हा पुढची पाच-सहा वर्ष आंदोलन करावं लागणार आहे. म्हणजे नुसतं आंदोलनातच वय निघून जाणार, मराठ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळणार कधी, असा सवाल जरांगे यांनी विचारला आहे. ओबीसीतलं टिकणार आरक्षण आहे. जी अधिसूनचा काढली त्याची अंमलबजावणी हवी बाकी आम्हाला काय माहित नाही, असं जरांगे पाटील यांनी ठणकावलं आहे.

ज्या जमिनीचा सातबाराच नाही, ते आरक्षण कोर्टात टिकणार कसं? हे पन्नास टक्क्यांच्या वर जातंय. पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण टिकतच नाही. पण आता मराठे हुशार झाले आहेत. मागच्यावेळीही सरकारने तेच केलं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला फक्त टिकणारेच आरक्षण हवंय. गायकवाड आयोगाच्या वेळीही सरकारने टिकणाऱ्या आरक्षणाचा दावा केला होता पण आरक्षण टिकले नाही. त्यावेळी सरकारनेच आरक्षण टीकण्याचा दावा केला होता. पण तरीही टिकले नाही. सगे सोयरे कायदा बनवायला कसला वेळ लागतो. तुम्हाला काय 50 एकर जमीन खूरपायाची आहे का.? असा सवाल जरांगेंनी विचारलाय.

आमच्या नोंदी सापडल्या आहेत, आम्हांला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. हे सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशी करत नाही हे बघतो असा इशारा जरांगेंनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे. तो नास्तिक आहे. जिथे मराठ्यांचं वाटोळं होतं त्याला तो पाठिंबा देतो अशी टीका जरांगेंनी केलीय. हे आरक्षण 5 ते 6 जणांना हवंय. हे आरक्षण म्हणजे खालून टाकली माती वरून टाकला स्लॅब असं आहे.

आजचा दिवस वाट बघू, आता फक्त अंमलबजावणी बाकी आहे. तेवढीच आम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला 15 दिवसांचा वेळ लागत होता. तो मराठ्यांनी दिला. तुम्ही जे बोलला आहात ते करा, आता आमचे अभ्यासक, वकील थकले आहे. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. सरकारने स्वतःचा कार्यक्रम स्वतःच लावून घेतला आहे, आम्हाला सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केला आहे.

आमच्या नोंदी ओबीसी आरक्षणात आहे, तुम्ही आमहाला डोकं लावायचं नाही. आता चर्चाच बघू आणि आंदोलनाचं उद्या बघू आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. आम्हाला संयमाने घ्यायचं आहे.एका दणक्यात सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेऊ, फक्त शांततेत आंदोलन करा, 6महिने आम्ही चर्चा केली आहे आमदार मंत्र्यांना साहेब म्हणतो त्यांनी सग्या-सोयऱ्यांच्या बाबतीत बोलावे अन्यथा तुम्ही आमच्या पोरांसाठी विषाची बाटली घेऊन उभे राहिलेत असे आम्ही समजू. मी खानदानी मराठा आहे मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh