मुंबई – यंदाच्या कमी पाऊसमानाचा गंभीर फटका राज्याला बसण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला आहे. यामुळे वीजेची निर्मिती व पुरवठा यात मोठी तफावत निर्माण आहे. परिणामी, राज्यावर आपत्कालीन लोडशेडिंग म्हणजे भारनियमन करण्याची वेळ आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील नागरिकांना दररोज अर्धा ते 2 तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
यंदा राज्यात कमी पाऊसमान झाले आहे. त्यामुळे वीजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही मागणी पूर्ण करण्यात महावितरणला अपयश येत आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी अर्धा ते 2 तासापर्यंतचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. कमी पाऊसमानामुळे शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी होणारा पाण्याचा उपसा वाढला आहे. परिणामी वीजेची मागणी वाढून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली. राज्यात काही भागात अर्धा तास ते 2 तासांपर्यंत लोडशेडिंग केली जात आहे. वीजेची वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस झाला, तर लोडशेडिंग आपसूकच बंद होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
दुसरीकडे महाजेनकोने कमी पावसामुळे औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट देखभालीसाठी बंद ठेवली आहेत. यामुळे वीजेची मागणी व पुरवठ्यात तब्बल 2 ते 3 हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. महावितरणने या समस्येचा निपटारा करण्यासाठी काही फिडरवर अचानक लोडशेडिंग सुरू केले. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागांत बुधवारी भारनियमन करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी स्थितीत काहीशी सुधारणा झाली. पण अमरावती विभागातील काही भागांत गुरुवारीही वीज कपात करण्यात आली.
मागणी पुरवठ्यातील तुटवडा वाढला
महावितरणच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत वीजेची कमाल मागणी 26 हजार मेगावॅटपेक्षा जास्त वाढली आहे. सामान्यतः ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसामुळे कृषी क्षेत्रातील विजेची मागणी कमी होते. पण यंदा ही मागणी कमी झाली नाही. उलट वाढत्या उकाड्यामुळे एसी, कुलर अजून सुरू आहेत. त्यामुळे वीजेची मागणी वाढली आहे, असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.