हेमकांत गायकवाड
चोपडा : जळगांव जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी कोळी समाजाला अनु. जमाती(टोकरे कोळी)जात प्रमाणपत्रा बाबत न्याय मिळवून द्यावा,अन्यथा पुढील निवडणुकीत मतांचा जोगवा मागायला येऊ नये, असा सूचक इशारा चोपडा म. वाल्मिकी समाज मंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर(गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये दिलेला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कोळी समाजाकडे येतात, आम्हाला निवडुन द्या,आम्ही तुम्हाला न्याय मिळवुन देऊ, अशा भुलथापा देऊन मते मिळवितात.निवडून आल्यावर त्यांना समाजाचा विसर पडतो.समाजाच्या अडीअडचणींबाबत विचारविनिमय न करता फक्त मतांसाठी समाजाचा वापर करतात.प्रत्येक पुढारी हा आधी आपल्या समाजावरच मोठा नेता झालेला असतो. कालांतराने त्यांना आपल्या समाजाचा पद्धतशीरपणे विसर पडतो. पक्षाची चादर ओढून समाजाला सावत्र वागणूक देणार्या सर्वच नेत्यांनी आपापल्या समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावा, तरच पुढील निवडणुकीत मतांसाठी क्षमायाचना करायला यावे,अशीही स्पष्टोक्ति सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.