भुसावळ – भारतात १२ व्या शतका पासून संत परंपरा निर्माण झाली त्या परंपरेतिल १४ व्या शतकात जन्माला आलेले संत रविदास हे प्रखर मानवतावादी होते, स्त्री – पुरूष विषमता न मानता त्यांनी महिलांना सुद्धा भक्तिमार्गात आणून त्यांना मानसन्मान मिळवून दिला, त्यांच्या मुळेच शुद्र – अतिशुद्र वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तित लीन होत गेला, रविदास पंथ निर्माण झाला त्यातून रविदास केवळ एका जातीचे न रहता सर्वच जाती धर्माचे आदर्श झाले असे विचार प्रसिद्ध साहीत्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी दीपनगर येथे आयोजित संत रविदास जयंती निमित्त कार्यक्रमात व्यक्त केले.
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , संत रविदास यांना ११२ ते १५० वर्षाचे आयुष्य लाभले , बाल वयापासून ते ईश्वरभक्ति करत होते. प्रबोधनपर काव्य करीत होते असे असताना त्यांचे नावे १८० पदे व २३० दोहे एवढे अल्प साहित्य शिल्लक राहिले याचा अर्थ त्यांचे मुळ साहित्य एकतर कोणीतरी चोरले वा ते नष्ट केले गेले. संत रविदास यांचे एवढ्या अल्पसहित्यातून एवढी सामाजिक, धार्मिक क्रांति होवू शकते तर पूर्ण साहित्यातून काय काय बदल झाले असते याची आपण कल्पना करु शकतो. संत रविदास यांना राजदरबारी राजाच्या बरोबरीची वागणूक दिली जात होती तेंव्हा राजकीय क्रांति सुद्धा घडू शकते एवढी ताकत त्यांच्यात आहे हे आपण समजून घ्यावे आज प्रत्येक संत, महापुरुष आपापल्या जातित आपणच वाटून टाकले व आपणच त्यांचे महत्व कमी कमी करु लागलो ही एक प्रकारे आपली लाजीरवाणी बाब आहे असे स्पष्ट मत वाघ यांनी विषद करुन बुद्ध, अशोक, कबीर, रविदास, फुले, शाहू, बाबासाहेब ही परंपरा आपण चालवावी असे आवाहनही जयसिंग वाघ यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप मुख्यअभियंता संतोष वकारे होते , त्यांनी आपल्या भाषणात संत रविदास यांचा सामाजिक व आध्यात्मिक लढा आजच्या पीढीला मार्गदर्शक आहे, ते समतेचे कैवारी असून आज समता प्रस्थापित करण्या करीता आपण कटिबद्ध होने आवश्यक आहे असे विचार व्यक्त केले.
सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेन्द्र बावस्कर यांनी रविदास यांच्या विविध दोह्यांचे दाखले देवून ते आदर्श समाजव्यवस्थेचे निर्माते होते , संत रविदास यांनी आपले १५० वर्षे जनप्रबोधना करीता खर्ची घातले, त्यांचा रविदास पंथ आजही मोठ्या प्रमाणात आहे असे सांगितले. प्रास्ताविकपर भाषणात डॉ. संजू भटकर यांनी आपण आपले आदर्श , महापुरुष जातिजातित विभागुन टाकले ही मोठी शोकांतिका आहे, संत रविदास यांनी जाती, धर्म यांच्या भिंति तोडून टाकल्या आहेत व हाच आजचा खरा आदर्श आहे असे सांगितले. आमदारसंजय सावकारे यांनी सभास्थळी भेट देवून संत रविदास यांच्या प्रतिमेस वंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास घोपे तर आभारप्रदर्शन मोहित कांबळे यांनी केले. कार्यक्रमास अशोक भगत, रविंद्र सोनकुसरे, मुकेश मेश्राम, चेतन आंबटकर, संजय हिरवे, किशोर शिरभैया, मनीष बेडेकर, राजेश निकम, डॉ. प्रशांत वाघ, इतर अधिकारी तसेच श्रोते मोठ्यासंखेने हजर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रशांत वाघ, रोशन वाघ, रामेश्वर तायड़े, विक्रम अहिरे, गोपाल चिम, चिंतामण सोनवणे, राजेश ढोके यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरुवतीस संत रविदास यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या जयजयकारच्या घोषणा देण्यात आल्या.