रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता मिळणार ई रेशन कार्ड

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेले रेशनकार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी ई-रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. कार्डमध्ये नाव कमी करणे, नोंदविणे, ट्रान्सफर करणे आदी कामे झटक्यात होणार आहेत.
ही प्रणाली राज्यात सुरू झाली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने ई-कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ई-रेशनकार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

क्यूआर कोड असलेले ऑनलाईन रेशनकार्ड देण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करणे, पत्ता बदलणे, नावातील दुरुस्ती तसेच नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे ही कामे कार्यालयात न जाता घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहेत. अन्य जिल्ह्यांतही हळूहळू ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जुने, फाटलेले, मळकट रेशनकार्डपासून नागरिकांची सुटका होणार आहे. ई- रेशनकार्ड वाटेल तेव्हा ऑनलाइन ओपन करता येणार आहे. कार्ड डीजी लॉकरमध्येही दिसेल.

हव्या त्या ठिकाणी उपलब्ध

मेल, मोबाइल फोन आदींद्वारे पीडीएफ, फोटो स्वरूपात हे ई- रेशनकार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन असल्यामुळे कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढता येणार आहे. कोणत्याही शासकीय कामांसाठी किंवा रेशन घेण्यासाठी कार्ड घेऊन जाण्याची गरज राहणार नाही.

jalgaonsandesh

jalgaonsandesh