खूशखबर! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन! ‘या’ भागात मुसळधार!

पुणे : मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र नागरिकांसाठी चांगली खूशखबर मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचे आज आगमन झाले असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.

राज्यात आज नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. कोकणातील रत्नागिरी त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर ते मेडक, भद्राचलम, विजयनगर आणि बंगालची खाडी या परिसरात पाऊस सुरू झाला आहे. राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे.

काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागला आहे. रेमल वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यांत जोरदार पाऊस पडला होता.

 

साधारणपणे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या राज्यांत मान्सूनची एन्ट्री ५ जूनपासून होते. परंतु, मान्सूनची सध्याची गती पाहता एक ते दोन दिवस आधीच या भागात मान्सून दाखल झाला. आयएमडीने असा अंदाज व्यक्त केला होता की दक्षिण अरब समुद्र, लक्षद्वीप आणि बंगालच्या खाडीतील विविध ठिकाणी मान्सून पुढे सरकणार आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या पाऊस होईल असा अंदाज आहे.