प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील शेतकरी रमेश सुरेश बोबडे यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देऊन अयोध्येत सत्कार करण्यात आला. या बाबत माहिती अशी की ICAR च्या मसाला व सुगंधी वनौषधी विभागा मार्फत 31 व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन दि. 7 ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आचार्य नरेंद्र देव कृषि तंत्रज्ञान विद्यापीठ, कुमारगंज अयोध्या येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमास अध्यक्ष डॉ. बिजेद्रकुमार सिंग (कुलगुरु) व प्रमुख अतिथी डॉ. एस. के. सिंग (ICAR New Delhi च्या मसाला व सुगंधी वनौपषधी विभागाचे प्रमुख) तसेच देशातील मसाला व सुगंधी वनौषधी विदयापीठातील इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. या 31 व्या वार्षिक अधिवेशनात देशभरातील विद्यापीठातील संशोधकांनी पानवेल आणि सुगंधी वनौपषधी वनस्पती यावर काय संशोधन केले पुढे संशोधनाची दिशा कशी असावी, या वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे की ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य आर्थिक उन्नती साधता येईल आणि त्यांची भरभराट होईल या विषयावर येत्या 3 दिवस कार्यशाळेत चर्चा होणार असून या कार्यक्रमात देशभरातून विविध क्षेत्रात कार्य करणारे संशोधक, प्राध्यापक व विचारवंत उपस्थित होते. कार्यक्रमात देशभरातल्या शेतकऱ्यांनी मसाला व सुगंधी वनौपषधी पिकांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन ICAR राषटी्य पुरसकार शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शेतकरी म्हणून आपल्या भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानांचे येथील रमेश सुरेश बोबडे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . श्री. रमेश बोबडे यांनी मागील 4 वर्षांपूर्वी भारतीय फळ संशोधन संस्था IIHR बंगलोर येथून आणलेल्या संशोधित एका पानवेल रोपांपासून 3000 कलमे तयार करून त्याचा महाराष्ट्रात प्रचार व प्रसार केला. तसेच या वाणांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून नवीन वाणाची ओळख करून दिली. या त्यांच्या कार्याची दखल वरील संस्थेने घेऊन त्यांचे पुरस्कार प्राप्तीसाठी नांव सुचविले. त्यांच्या या कार्याबद्द्ल श्री. रमेश बोबडे यांच्यावर कृषि स्तरातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
रमेश बोबडे या शेतकऱ्याने वेळोवेळी कृषी विभागातील आत्माच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यात सक्रिय सहभाग घेऊन तेथील नवीन तंत्रज्ञान पाहून-शिकून व आत्मसात करून प्रत्यक्ष आपल्या शेतीत उतरविले त्यामुळे त्यांना हे यश प्राप्त झाले. इतर सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊन कृषी क्षेत्रात आपली प्रगती साधावी. (श्री प्रमोद जाधव, तंत्र व्यवस्थापक, आत्मा भुसावळ)
पानवेल कृषी विकास मंडळातील शेतकरी श्री रमेश बोबडे यांनी पानवेल क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन सनमानीत केल्याबद्दल आम्हां शेतकऱ्यांना व सर्व पानवेल उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा अभिमान आहे, निश्चितच या मिळालेल्या पुरस्कारामुळे पानवेल उत्पादक शेतीला उत्पन्नाची एक नवीन दिशा मिळेल आणि नामशेष होत असलेल्या पानवेलीला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. असे विनोद बारी, सचिव – पानवेल कृषी विकास मंडळ, कु-हा पानांचे ता. भुसावळ यांनी कळविले आहे.