सातारा – मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले.
मुख्यमंत्र्यांच्या शेतात औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड करण्यात आली आहे.
यावेळी माध्यमांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण इतर सर्व बाबी बाजूला राहतात. गाव, शेती गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.
शेतकऱ्यांनी क्लस्टर शेतीकडे वळावे
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, असे सांगून सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबू बरोबरच रेशीम, सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा पर्यटनाचा आराखडा तयार
कादांटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे खोरे निसर्ग संपन्न आहे. या खोऱ्यात वासोटा किल्ला, उत्तेश्वर मंदिर यासारखी विविध पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.