दोंदवाडे ता जामनेर येथे महावितरण च्या दुर्लक्षामुळे लोंबकळलेल्या विज तारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव…?

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी जात असताना लोंबकळलेल्या वीजतारांना कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील दोंदवाडे येथे एकूलती शिवारात दि . २० जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली .

याबाबत सविस्तर वृत्त असे की , सध्या सर्वत्र शेती कामांना वेग आला आहे दोंदवाडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी शिवाजी गरबड पाटील ( वय – ५५ वर्षे ) हे त्यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी गेले होते त्यांनी कोळपे खांद्यावर घेऊन शेतात प्रवेश करताच लोंबकळलेल्या विजतारांना त्यांच्या खांद्यावरील कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला . विजेच्या धक्क्यामुळे त्यांनी जोरात किंकाळी मारली व ते खाली कोसळले .त्यांच्या आवाजाने त्यांचा मजूर श्री पावरा धावत आला . त्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले . त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ . संदीप पाटील यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले .पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , पोलीस पाटील नितीन परदेशी यांच्यासह दोंदवाडे , एकूलती, पहूर येथील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली . याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ .संदीप पाटील यांच्या खबरी वरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील हे करीत आहेत .

महावितरणचे दुर्लक्ष –

महावितरण कंपनीचे शेत शिवारातील वीजतारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . वर्षानुवर्षे जीर्ण झालेल्या , लोंबकळणाऱ्या विजतारा शेतकऱ्यांच्या जिवाशीच क्रुर खेळ खेळत असून सदर वीजतारा सुव्यवस्थित करण्याची तसेच निष्पाप मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे *

प्रगतिशील शेतकरी शिवाजी पाटील हे हसतमुख आणि सर्वांच्या हाकेला ओ देणारे कष्टकरी होते .ज्या शेतात आयुष्यभर कष्ट उपसले त्याच शेतात विजेच्या धक्क्याने अखेरचा श्वास घेतला . ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी लौकिकास्पद कार्य केले . त्यांच्या पत्नी सिंधुबाई पाटील यांनी देखील दहा वर्षे ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून पद भूषविले .शेतकरी शिवाजी पाटील यांच्या अकाली निधनाने एकुलती दोंदवाडे परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .