मुंबई – राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याची घोषणा आज ( २१ एप्रिल ) शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
ज्या शाळांचा अभ्यासक्रम सुरू त्यांनी सकाळच्या सत्रात आपले अभ्यासक्रम उरकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे शाळा या १५ जूनपासून उर्वरित महाराष्ट्र आणि ३० जून विदर्भातील शाळा सुरू होतील असंही केसरकर यांनी स्पष्ट केले. खारघर येथे झालेल्या मुत्यूमुळे पालकवर्ग चिंतेत होता. त्यापार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत होती. यामुळे शिक्षणमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर
माध्यमांशी बोलताना केसरकर यांनी मोठी घोषणा केली. याबाबत माहिती देताना दीपक केसरकर यांनी सांगितलं की, ‘महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून शुक्रवारपासून ( २१ एप्रिल ) मुलांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांचाअभ्यासक्रम अद्याप सुरू आहे, त्या वगळता बोर्डाच्या सर्व शाळांना सुट्टी असेल. १५ जूनला उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भातील शाळा ३० जूनला सुरू होतील.’ त्यांच्या या घोषणेमुळे पालक आणि मुलांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, केसरकर यांनी ‘राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांत आठवीच्या यंदाच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही,’ असं देखील दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे नवीन अभ्याक्रमांसह जूनमहिन्यापासुन राज्यातील सर्व शाळा सुरु होणार आहेत.