मुंबई – लहानपणापासून आपण बालभारती आणि बालभारतीच्या पुस्तकांमधून शिक्षण घेतलं आहे. बालभारती विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयांवर अभ्यासक्रमातील पुस्तकं बनवण्याचं काम करत असतं.
त्यात वेळोवेळी योग्य ते बदलही करण्यात येतात. असाच एक बदल यंदा करण्यात आला होता. मात्र या बदलामुळे बालभारती मोफत दिलेली पुस्तकं परत घेण्याच्या विचारात आहे. पण नक्की झालंय काय?
पुस्तकं परत घेण्याचं कारण काय? जाणून घेऊया. विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं जास्त होऊ नये म्हणून यंदा पुस्तकांसोबतच वह्यांची पानंही जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसं करण्यातही आलं होतं
मात्र आता ही पुस्तकं बालभारती परत घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसं आवाहनच बालभारतीकडून शाळांना करण्यात आलं आहे.
बाल भारती कडून मोफत दिली गेलेली पठ्या पुस्तकांची पाने सुटतायेत अशी चर्चा आहे. त्यामुळे ज्या पुस्तकांची पाने सुटली असतील त्या त्या शाळांनी पुस्तके परत करावीत त्या ठिकाणी नवीन पुस्तके दिली जातील असं आवाहन बालभारतीकडून शाळांना करण्यात आलं आहे.
मात्र असं असलं तरी अद्याप कोणत्याही शाळेकडून यासंबंधीची तक्रार आली नाही असं स्पष्टीकरणही बालभारतीकडून देण्यात आलं आहे. …तरच पुस्तकं परत होतील बालभारतीकडून पुस्तकं बदलून देण्यात येणार असली तरी सर्वच पुस्तकं सरसकट बदलून मिळणार नाहीये. ज्या पुस्तकांमध्ये आधी पासूनच मुद्रण दोष असतील किंवा पानं फाटलेली असतील अशीच पुस्तकं परत घेऊन त्या जागी नवीन पुस्तकं दिली जाणार आहेत. त्यामुळे या गोष्टी विद्यार्थी, पालक आणि शाळांनी लक्षात घेणं आवश्यक आहे.