‘समृद्धी’ अपघात प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

छत्रपती संभाजीनगर – रविवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले होते. मिनी ट्रॅव्हल्सने समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला.

दरम्यान आरटीओ अधिकारी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं होतं. आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात दोन आरटीओ अधिकारी आणि चालकावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केलं आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गोणारकर अशी अटक करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावं आहेत. तर ब्रिजेश चंदेल असं चालकाचं नाव आहे. संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, अपघाताबाबत आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमका आरोप?

रविवारी समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ भीषण अपघात झाला. समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून मिनी ट्रॅव्हलने धडक दिली. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले. दरम्यान आरटीओची गाडी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील असाच आरोप केला होता. या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. रविवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. अखेर त्यांना अटक करण्यात आलं आहे.

ताजा खबरें