अकबराने राजकन्येशी नव्हे तर नोकराणीशी लग्न केलं

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मुघल बादशाह अकबराच्या विवाहासंदर्भात दिलेल्या वक्तव्यानं नव्या ऐतिहासिक चर्चेला सुरुवात केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “अकबराने राजकुमारी जोधाबाईशी नव्हे, तर आमेरच्या एका महालातील नोकराणीशी विवाह केला होता.”

महाराणा प्रताप जयंतीच्या पूर्वसंध्येला बोलताना बागडे म्हणाले, “इतिहास आणि चित्रपटांमुळे हे मानलं गेलं की अकबर व जोधाबाई यांचं लग्न झालं होतं. परंतु हे पूर्णतः खोटं आहे. अकबराची पत्नी कोणी राजकन्या नव्हती, ती नोकराणीची मुलगी होती. आमेरच्या राजा भारमलाने हा विवाह जुळवून दिला होता, मात्र त्यात राजकन्येचा काही संबंध नव्हता.”

बागडे यांनी ‘अकबरनामा’ या अधिकृत इतिहासग्रंथाचा संदर्भ देत सांगितलं की, “त्यात जोधाबाईचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. जर ती राजकन्या असती तर तिचा उल्लेख नक्की झाला असता.” ऐतिहासिक माहितीप्रमाणे, अकबराने १५६९ मध्ये राजकीय युती म्हणून आमेरच्या राजाची मुलगी – ज्याला हरका बाई अथवा मरियम-उज़-ज़मानी म्हणतात – हिच्याशी विवाह केला होता.

राज्यपाल बागडे यांनी ब्रिटिश इतिहासकारांवर भारताचा इतिहास विकृत केल्याचा आरोप करत म्हटलं की, “आपल्या मुलांना अकबरासारख्या विदेशी सत्ताधीशांचे गौरवगान शिकवलं गेलं आणि महाराणा प्रताप यांचा स्वाभिमान बाजूला टाकण्यात आला. परंतु, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात हे बदल होत आहेत. आपल्या संस्कृतीचं व अभिमानाचं शिक्षण आता नव्या पिढीला दिलं जातं आहे.”

ते पुढे म्हणाले, “महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रतीक आहेत. दोघांमध्ये ९० वर्षांचं अंतर होतं, पण जर ते एकाच काळात असते, तर देशाचा इतिहास वेगळाच असता.”

याच कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये महाराणा प्रतापांची घोड्यावर बसलेली भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे, जी त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे.