‘ हॅलो! कौन बनेगा करोडपतीमधून बोलतोय…’ म्हणत 25 लाखांच्या लॉटरीचं आमिष, नंतर लाखोंनी लुटलं

जळगाव : सावधान जर आपल्याला अनोळखी क्रमांकावरुन फोन येत असेल आणि फोनवर बोलणारा व्यक्ती ‘मी कौन बनेगा करोडपती’मधून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला लाखो रुपये जिंकल्याचे आमिष दाखवत असेल तर खबरदार! संबंधित व्यक्तीला कुठलाही प्रतिसाद देऊ नका, अथवा तुमची फसवणूक होऊ शकते. कारण असाच काहीसा प्रकार जळगावात समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील टिटवे येथे मायाबाई पाटील या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मायाबाई पाटील याच्या मोबाईल क्रमांकावर 5 फेब्रुवारीला अनोळखी क्रमांकावरुन व्हॉट्सअप कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या संबधित व्यक्तीने मायाबाई यांना कौन बनेगा करोडपती स्कीममध्ये 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचे सांगितले. सध्या रक्कम मिळवण्यासाठी प्रतापसिंह यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगितले. फोन ठेवताच काही वेळात संपर्क क्रमांकाचा संदेश आला तसेच व्हाईस कॉल आला. मायाबाई यांनी हा प्रकार त्यांचे पती आणि मुलाला सांगितला. तिघांना प्रकार खरा वाटला म्हणून त्यांनी मेसेजमध्ये आलेल्या नंबरवर फोन केला.

खात्याची मर्यादा कमी असल्याची बतावणी

संबधितांनी मायाबाई यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांना बँक खात्याचा नंबर मागितला. बँक खाते हे कमी लोड पैसे घेणारे असल्याची बतावणी संबंधितांनी मायाबाई यांना केली. त्यामुळे जिंकलेल्या लॉटरीची एवढी मोठी रक्कम खात्यावर जमा करता येणार नाही असेही सांगितले. खात्याची मर्यादा वाढवण्यासाठी संबंधितांनी गोड बोलून मायाबाई यांना ऑनलाइन पैसे जमा करण्यास सांगितले.

मायाबाई यांनी संबंधितांनी सांगितल्यानुसार बँक खात्यावर गुगल पे आणि फोनपेवरुन वेळोवेळी 185 रुपये, चार वेळा 5 हजार रुपये, 3 हजार रुपये, 25 हजार, दोन वेळा 15 हजार, 10 हजार , तीनवेळा 20 हजार आणि 35 हजार असे एकूण 1 लाख 84 हजार 850 रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर कुठलीही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने तसेच फोन करणाऱ्या अनोळखींकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने मायाबाई यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी गुरुवारी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन फसवणूक करणाऱ्या अनोळखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारी हे करीत आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh