इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन सिंधू’ नावाची विशेष बचाव मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत पहिले बचाव विमान ११० भारतीय नागरिकांना घेऊन येरेव्हान (आर्मेनिया) येथून दिल्ली येथे यशस्वीरित्या पोहोचले.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) याबाबत माहिती देताना सांगितले की, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या समन्वयाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. “तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
१८ जून रोजी भारतीय विद्यार्थी येरेव्हानमधील झ्वार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी २:५५ वाजता (IST) दिल्लीकडे निघाले आणि १९ जूनच्या पहाटे दिल्ली विमानतळावर पोहोचले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले, “ऑपरेशन सिंधूची सुरुवात झाली आहे. भारताने इराणमधील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ही विशेष मोहिम सुरू केली आहे. ११० विद्यार्थी उत्तर इराणमधून आर्मेनियामध्ये आमच्या दुतावासांच्या देखरेखीखाली पोहोचवण्यात आले आणि ते येरेव्हानहून विशेष विमानाने भारतात परतले.”
भारतीय अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेसाठी इराण व आर्मेनिया सरकारचे आभार मानले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही नमूद केले आहे की, इराणमधील इतर नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून त्यांच्या भारतात परतीसाठी योग्य पर्यायांची सोय केली जात आहे.
मंत्रालयाने भारतातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पुन्हा स्पष्ट केले असून इराणमध्ये उर्वरित राहिलेल्या नागरिकांना तेहरानमधील भारतीय दूतावासाशी तसेच नवी दिल्ली येथील २४ तास सुरु असलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.