जळगाव तालुक्यातील सोनाळे (ता. जामनेर) येथील महिला तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) कीर्ती रमेशराव निघोट यांच्यावर दबाव आणून त्यांना मानसिक त्रास देण्याचा, तसेच त्यांच्यासह त्यांच्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या कोतवाल अमोल विकास निकम याच्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली आहे.
कीर्ती निघोट यांनी १४ जून रोजी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तसेच या प्रकाराची तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी चौकशी दरम्यान सखोल तपास करून कोतवाल अमोल निकम दोषी असल्याचे निष्कर्ष दिले. त्या अनुषंगाने प्रशासनाने तात्काळ अमोल निकम याला निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत निकम यांना जामनेर मुख्यालयात सेवा बजावावी लागणार आहे. त्यांना तहसीलदारांची पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेश दिले आहेत.
कोणते आरोप आहेत?
-
तलाठी किर्ती निघोट यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न.
-
शासकीय प्रणालीचा गैरवापर करणे.
-
काही साथीदारांच्या मदतीने निघोट व त्यांच्या पतीच्या हत्येचा कट रचणे.
-
प्रशासकीय शिस्त भंग करणे व १९७९ मधील कलम ३ चे उल्लंघन करणे.
-
जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनाची प्रतिमा मलीन करणे.
न्यायाच्या प्रतीक्षेत…
सदर प्रकरणाची चौकशी पुढे सुरू असून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिल्याने प्रशासन देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहे.