जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी गुलाबराव पाटील यांचा पुढाकार !

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क 

जळगाव -: जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या व प्रस्तावित असलेल्या सर्व कामांवर मंत्री गुलाबराव पाटील कटाक्षाने लक्ष केंद्रीत करुन नागरिकांना सोयी-सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी झटत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महानगरपालिकेला निधी देण्याची प्रथा त्यांनी सुरु केल्याने शहरातील विकास कामांचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्राला त्यांच्या पुढाकारातून मोठा निधी उपलब्ध होत आहे. एक विकसित जिल्हा करण्याचा त्यांचा मानस असून त्यासाठी ते झपाटून काम करीत आहेत. राज्यातील पहिले वारकरी भवन, मिल्क बँक उभारण्याचा मान जिल्ह्याला मिळाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध विकासकामे होत असून ‘विकासाची गंगा घरोघरी’ पोहचत आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जळगाव, धरणगाव व मुक्ताईनगर येथे 75 फुट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. भुसावळ ते इगतपुरी मेमू एक्सप्रेसचे तिरंगा एक्सप्रेस म्हणून संचालन करण्यात आले. सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामुळे गुलाबराव पाटलांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणली. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आपल्या जिल्ह्यात ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणी केलेली आहे. यामुळे पीक कर्ज, पिक विमा योजना व कृषी गणना करणे अत्यंत सुलभ आणि अचूकरित्या पूर्ण करता येते.
जळगाव जिल्ह्यातील सातबारा उताऱ्यांवरील दीर्घ कालावधीपासून प्रलंबित कालबाह्य फेरफार नोंदी वगळण्याची धडक मोहीम स्वयंस्फूर्तपणे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेमार्फत राबवीत अद्ययावत अभिलेख तयार केले. या मोहिमेचा जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. या कामगिरीबद्दल राज्य शासनाकडून जिल्ह्याला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत सन्मानित करण्यात आले हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे आणि तेही गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले.

संभाव्य शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्ह्यात शेतकरी संवेदना अभियान राबविले गेले. त्याअंतर्गत शेतकरी यांच्या बैठका घेण्यात आल्या, त्यांचे समुपदेशन करण्यात आले, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून अडचणी सोडविण्यात आल्या. सेवाभावी संस्था, दानशुर व्यक्ती यांचेकडून उपजिवीकेसाठी विविध साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. बँक समाधान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले, मेळाव्यांतून सुमारे सात हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला.
शेती अवजारे बँक स्थापन करुन शेती अवजारे मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे आयुष्यात सकारात्मक आशेचा किरण देण्याचा प्रशासनाचा दृढनिश्चय आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत मुदतीत कर्ज परतफेड करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या शेतकरी सभासदांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. यावर्षी आदिवासी क्षेत्रातील 316 सभासदांना 4 लाख 47 हजार तर आदिवासी क्षेत्राबाहेरील 531 सभासदांना 5 लाख 57 हजार एवढ्या रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे.

हर खेत को पाणी या योजनेअंतर्गत वाघुर धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या ‘हर खेत को पाणी’ या योजनेअंतर्गत ‘प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना’ अंतर्गत निधी उपलब्ध करुन आणला. वाघुर जलाशयाच्या वरच्या भागात उपसा प्रणालीव्दारे मोठ्या प्रमाणावर शेततळे उभारण्याचे काम कृषि विभागाच्या मदतीने राबविण्यात आले. गिरणा नदीवर अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित 7 बलुन बंधारे कामांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता प्राप्त असून नवीन शासनाने पर्यावरण मान्यता देऊन कामे सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. तो प्रस्तावही लवकरच मार्गी लागणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन यात केलेल्या कामगिरी बद्दल राज्य शासनाने सलग दुसऱ्या वर्षी जळगाव जिल्ह्याचा गौरव करुन सन्मानित केले. तापमानात सातत्याने होणारी वाढ, बदलते हवामान, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींवर मात करणे व वनाच्छादन वाढविणेसाठी हरित जळगाव मोहीमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत विविध खुल्या जागांवर वृक्षारोपण करण्यात येत आहे.

म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर असून जळगाव ते चोपडा रस्त्यावरील तापी नदीवरील खेडी ते भोकर दरम्यानच्या पुलाचे काम पावसाळ्या नंतर काम सुरू होईल. राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 चे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून प्रकल्पांची लांबी सुमारे दिडशे किमी असून सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चातून महामार्गाचे काम करण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत जळगाव शहरातून महामार्गचीही सुधारणा करण्यात येणार आहे. जळगाव, भडगाव, चाळीसगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पहूर जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर ते राज्यसीमा हद्द या राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एल च्या दुपदरी धावपट्टीची सुधारणा करण्यात येत आहे. या रस्त्यामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही राज्ये जोडली जाऊन हा रस्ता जड वाहतूकीस सुकर होत आहे. जळगाव- भुसावळ तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले असून जळगाव मनमाड तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जळगाव-भुसावळ चौथ्या रेल्वेमार्गाचे कामकाज ही वेगात सुरु आहे. जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. विमानतळ विस्तारीकरणाची सुमारे 1.5 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. यामुळे बोईंग, एअरबस या सारखी विमाने जळगाव विमानतळावरुन उड्डाण घेऊ शकतील. विदेशातील जळगावकरांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे संकेतस्थळ तयार करणेत आले असून विदेशात शिक्षण, नोकरीसाठी जाणाऱ्या जळगाव जिल्हावासियांना मदत करणेसाठी तसेच संकटकाळात हे संकेतस्थळ उपयुक्त ठरत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन माता व बाल संगोपन केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णांना तसेच नवजात बालकांना तातडीचे औषधी उपचार व शस्त्रक्रिया या ठिकाणी होतील. मोहाडी येथे शंभर खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून तीन मॉड्युलर ऑपरेशन थेटर तयार करण्यात आले.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी हे शासन नेहमीच कटिबध्द राहील, असे मंत्री गुलाबराव पाटील सांगतात. जिल्हा, राज्य आणि राष्ट्र अधिक मजबूत आणि विकसित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करुया असेही ते आवर्जुन सांगतात. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासावर भर देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील राष्ट्र उभारणीवर भर देण्यात येत असल्याचे श्री. गुलाबरा पाटील यांनी सांगीतले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh