जळगाव :- सिद्धार्थ गौतम यांना ज्ञान प्राप्ती झाल्या नंतर ते बुद्ध म्हणून ओळखले जावू लागले. बुद्ध झाल्या नंतर त्यांनी सारनाथ येथील मृगदाय वनात आषाढ पौर्णिमेस पाच तपस्विं समोर पाहिले प्रवचन दिले, त्या प्रवचनाने प्रभावित होऊन ते तपस्वी बुध्दांना शरण गेले व बुद्धानुयायी झाले . त्यानंतर गौतम बुद्ध यांनी अधिकृतरित्या बौद्ध धम्म स्थापन केला व बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारार्थ भिख्खू संघ स्थापन केला त्यामुळे आषाढ पौर्णिमा हा दिवस ‘ बौद्ध धम्म स्थापना दिवस’ ठरतो असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले. जळगाव येथील जेतवन बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमे निमित्त २१ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात वाघ बोलत होते.
आपल्या भाषणात जयसिंग वाघ यांनी पुढं सांगितले की, धर्म व धम्म या भिन्न भिन्न संकल्पना आहेत. गौतम बुद्ध यांनी धर्म नाही तर धम्म स्थापन केला आहे. गौतम बुद्ध यांनी जे त्रीसरण दिले आहेत त्यात’ धम्मम सरणम गच्छामी ‘येक आहे. मात्र बौद्ध धम्मास रूढ अर्थाने बौद्ध धर्म असेच संबोधले जाते. आज जगात अनेक धर्म आहेत मात्र त्या सर्व धर्मांची निर्मिती बौद्ध धर्मा नंतरची आहे हे दिसून येते. काही धर्म हे धर्म म्हणून नाही तर संस्कृती म्हणून ओळखले जातात ही बाब समजून घ्यावी असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजिंठा हाउसिंग सोसायटीचे चेअरमन दिलीप सपकाळे होते .सुरवातीस विजया शेजवळे, ज्योती भालेराव, कविता सपकाळे यांनी आषाढ पौर्णिमाचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन अशोक सैंदाणे, प्रास्ताविक दिलीप तासखेडकर, आभार नथू अहिरे, परिचय उज्वला तायडे यांनी केले.
सुरवातीस भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नूतन तासखेडकर, मीना बिऱ्हाडे, वर्षा कोचुरे यांनी बुद्ध वंदना घेतली. कमल सोनवणे, चारुलता सुरळके, पूजा कोचूरे, गीता सोनवणे, सुनंदा वाघ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कुसुम सोनवणे, सोनी साळुंके, जमुणाबाई साळवे, मीना शेजवळे, सोनी साळुंके, सरला भालेराव, वत्सला वानखेडे, प्रतिभा मोहोळ, कल्पना नंन्नवरे आदींसह स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.