मुंबई- पुन्हा एकदा हवामान खात्याने पुढील 4-5 दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच हवामान विभागाने येत्या ६ ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील काही भागांमधून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी पोषक हवामानाचे संकेत आहे.
बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली. आगामी चार दिवसांत घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार तर मध्य महराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या गुलाब आणि शाहीन चक्रीवादळामुळे राज्यात वेगाच्या वाऱ्यासह पाऊस झाला. गुलाब वादळामुळे झालेल्या पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले. राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.