पतंजलीच्या फसव्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. मंगळवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक रामदेव बाबा आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांनी हजेरी लावली होती. पतंजलीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ज्या उत्पादनांचे परवाने रद्द करण्यात आले त्याची विक्री थांबवली आहे. यावर न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाल्या की, पतंजलीला या उत्पादनांच्या साठ्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात द्यावी लागेल. पतंजलीने दिलेल्या जाहिरातींवर तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपिठाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासने आणि औषधोपचार यासाठी रामदेव बाबांनी महत्वाचे योगदान दिले आहे, पण फसव्या जाहीराती प्रकरण लोकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने त्यात हलगर्जीपणा चालणार नाही असे न्यायालयाने नमूद केले.
आता रामदेव बाबा यांना सर्वोच्च न्यायालयात पुढील हजर राहण्याबाबत सूट दिली आहे. याआधी सुनावणीमध्ये न्यायालयाने पतंजलीच्या त्या फसव्या जाहिरातींच्या विक्रीवर बंदी घातली होती, ज्याचा परवाना आता रद्द करण्यात आला आहे. पतंजलीच्या उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या लोक आणि संस्थांसाठीही न्यायालयाने एकूण 6 मुद्द्यांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिली होती.