अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

जळगाव – माणूस आज किती विकृत बुध्दीचा झाला हे जळगाव जामोद तालुक्यातील घटनेवरून पुन्हा अधोरेखीत झाले आहे. आपल्या चारचाकी वाहनाने झालेल्या अपघातात गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी नेतो असे सांगून आरोपीने चक्क जंगलातील दरीत टाकून दिले व उपचार न मिळाल्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. यासंदर्भात सविस्तर असे की, जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील आदिवासी युवक मन्साराम छत्तरसिंग वासकले (२२) हा लग्न समारंभाकरिता (ता.३०) भिंगारा येथे गेला होता.

लग्न समारंभ संपन्न झाल्यानंतर तो दुचाकी क्रमांक एमएच २८ एच ९१८९ ने संध्याकाळी आपल्या गावाकडे परत येत असताना निमखेडी ते सुनगाव रस्त्यावर गोराडा धरणा जवळ मालवाहू पिक-अप क्रमांक एमएच २७ बीएक्स ५३८२ च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन त्याच्या दुचाकीस धडक दिली.

या अपघातात मन्साराम वासकले हा गंभीर जखमी झाला. दरम्यान घटनास्थळावर लोकांसमक्ष जखमी मन्साराम यास उपचाराकरीता दवाखान्यात घेवुन जातो असे सांगून लोकांच्या मदतीने आरोपी मालवाहू चालकाने स्वताच्या वाहनामध्ये जखमी व्यक्तीस बसवून घेवून गेला.

परंतु जखमीस उपचाराकरीता दवाखाण्यात घेवून न जाता आरोपीने बऱ्हाणपूर रोडवरील शांतीलाल सस्ता यांचे शेतालगत असलेल्या जंगलात जखमी मन्साराम वासकले यास गाडीतून ढकलून दिल्याचे अमानवीय कृत्य केले.

उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होवू शकतो याची जाणीव असताना आरोपी मालवाहु चालकाने जंगलातील निर्मनुष्य स्थळी त्याला टाकून देवून पोबारा केला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून मन्साराम वासकले हा तेथेच पडून होता.

उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान (ता.२) सकाळी बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून पोस्ट मॉटम करीता मृतदेह ग्रामीण रूग्णालय जळगाव जामोद येथे पाठवला.

दरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा काही नागरिकांची याचे आपले मोबाईलमध्ये चित्रण केले होते. तर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर सुध्दा व्हायरल झाला होता. त्यामुळे मालवाहू वाहन क्रमांकाच्या आधारे तपास करत ठाणेदार आनंद महाजन यांनी आपले तपासचक्र गतिमान करून एका तासाच्या आत मालवाहू पिक-अप क्रमांक एमएच २७ बीएक्स ५३८२ चा चालक आरोपी योगेश सोपान महाजन वय ४० वर्ष, रा.बोरसर ता.जि.बऱ्हाणपूर यास अटक केली असून त्याच्याविरूध्द कलम ३०४, २०१ भादवी सह कलम १३४/१८६ मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपीस कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.

जळगाव जामोद वरून मध्य प्रदेशात जाण्यासाठी सातपुडा पर्वतातून एक जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अनेकदा भीषण अपघात होत आहेत. याकडे महाराष्ट्र व मध्यप्रदेश पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

तसेच जळगाव जामोद कडून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या सातपुडा पर्वतातील रस्त्यावर एक वनविभागाची चौकी असून सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस, अन्न व औषध प्रशासन तसेच महसूल विभागाचे कर्मचारी दिवसरात पहारा देतात.

या ठिकाणी दोन्ही कडून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी होते. परंतु असे असले तरीही या जखमी युवकाला ज्या पिकप वाहनातून नेण्यात आले त्या वाहनाची नोंद या चौकीतील पोलिसांच्या रजिस्टरमध्ये नाही.

ही एक गंभीर बाब असून येथे तैनात अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या गोराळा धरण परिसरात झालेल्या अपघातातील गुन्ह्यामध्ये या चेक पोस्टवरील कर्मचारी सुद्धा तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी मृतक इस्माच्या नातेवाईकांनी केली आहे.