लवकरच मोदींसोबत विद्यार्थ्यांची ‘परीक्षा पे चर्चा’; कधी, कुठे अन् कसा होणार कार्यक्रम? .

नवी दिल्ली – यंदा ‘परीक्षा पे चर्चा’ 2024  कार्यक्रम जानेवारीच्या अखेरीस होणार असल्याची माहिती मिळत आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी घेत असलेल्या या विशेष कार्यक्रमाची ही सातवी आवृत्ती असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष क्रेझ असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधू शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘परीक्षा पे चर्चा’ करण्यासाठी तुम्ही 12 जानेवारी 2024 पर्यंत mygov.in वेबसाइटवर नोंदणी करू शकता (PM Narendra Modi PPC 2024). यानंतर, नोंदणीची तारीख वाढण्याची फारशी आशा नाही. विद्यार्थी आणि शिक्षकांसोबतच मुलांचे पालकही ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी नोंदणी करू शकतात.

बोर्डाच्या परीक्षांमुळे येणारा ताण, हा ताण टाळण्याचे मार्ग, मुक्तपणे परीक्षा देण्याचे गुण अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित करता येणार आहे. जानेवारीच्या अखेरीस हा कार्यक्रम पार पडणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही देणार आहेत. दरवर्षी पीएम मोदी विद्यार्थ्यांशी त्यांच्या परीक्षांबाबत संवाद साधतात. तसेच, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात.

जानेवारीच्या अखेरीस ‘परीक्षा पे चर्चा’

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी ‘परीक्षा पे चर्चा’ या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. त्याची सुरुवात 2018 साली झाली. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी खुलेपणाने संवाद साधला.

कार्यक्रमाचं आयोजन कुठे केलं जाणार?

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही येथे आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थी या कार्यक्रमात सामील होऊ शकतात. मोठ्या संख्येनं विद्यार्थी पंतप्रधानांशी संवाद साधतात आणि त्यांचे प्रश्न पंतप्रधानांना विचारतात.

परीक्षेचं दडपण येऊ देऊ नका : पंतप्रधान

गेल्या काही सत्रांमध्ये पंतप्रधान मोदींनी मुलांना परीक्षेचं दडपण न घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यांना समजावून सांगून परीक्षेचा ताण घेऊ नका, परीक्षा दडपण न मानता, एखादा उत्सव म्हणून घ्या. यावेळी पंतप्रधान शिक्षकांपासून ते विद्यार्थी आणि पालकांपर्यंतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देतात.

देशभरातून मुलं कार्यक्रमात सहभागी होतात

पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी देशभरातून मुलं उपस्थित राहतात. प्रत्ये बोर्ड, प्रत्येक राज्यातून काही मुलं उपस्थित राहतात. परीक्षेचा ताण दूर करून हसतमुखानं परीक्षा देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तणावाचं यशात रूपांतर कसं करायचं? हे या कार्यक्रमाद्वारे समजावून सांगितलं आहे.