कत्रांटी तहसीलदार भरतीची जाहिरात अखेर रद्द; महसूलमंत्र्यांचा मोठा खुलासा

जळगाव – काही दिवसांपूर्वी शासनाकडून कंत्राटी तहसीलदार नियुक्तीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीवरून मोठा गोंधळ उडाला होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

अखेर या प्रकरणाची दखल सरकारनं घेतल्याचं दिसून येत आहे.

कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची जाहिरात तात्काळ रद्द करा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कंत्राटी पद्धतीनं तहसीलदारांची पदं भरण्याचं शासनाचं कुठलही धोरण नाही, असा खुलासा विखे पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले विखे पाटील?

कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची जाहिरात तात्काळ रद्द करा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत खुलासा करताना ते म्हणाले की, कंत्राटी पद्धतीनं तहसीलदारांची पदं भरण्याचं शासनाचं कुठलही धोरण नाही. जळगाव जिल्ह्यात भुसंपादनाच्या कामासाठी अनुभवी लोकांची गरज होती. म्हणून ती जाहिरात काढली होती, शासनाची ही पुर्वपद्धत आहे. पण या नियुक्तीची जाहिरात काढली गेल्याने आता कंत्राटी पद्धतीनेच तहसीलदार भरती होणार, असा गैरसमज झाला असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवारांचा हल्लाबोल 

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर यावरून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मुजोर सरकारला विरोधकांच्या आणि राज्यातील तरुणांच्या रोषापुढे आज झुकाव लागलं. परंतु, कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात ही कोणाच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना होती हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. विरोधकांनी टीका केल्यावर शुक्रवारी निघालेली जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी तीन दिवसांनी दिले.’

‘३ दिवस महसूल मंत्र्यांना हा विषय महत्वाचा वाटला नाही का ? राज्याचे महसूल मंत्री असतात कुठे? त्यांना त्यांच्या खात्यात काय घडतं आहे याची माहिती तरी आहे का? की महसूल मंत्री फक्त एका तालुक्याचे मंत्री आहेत? कंत्राटी तहसीलदार भरती जाहिरात रद्द करून जिल्हाधिकारी यांच्याकडून खुलासा मागवला आहे असे महसूल मंत्री म्हणतात. तीन दिवसांनी महसूल मंत्र्यांनी खुलासा मागवला, नशीब कंत्राटी तहसीलदार भरल्यावर खुलासा मागवला नाही’! असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी महसूलमंत्र्यांवर केला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh