D.Ed-B.Ed धारकांसाठी आनंदाची बातमी! राज्यात तब्बल 10 हजार शिक्षकांची होणार भरती

शिक्षकांची भरती करतेवेळी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची सूचना करण्यात केली होती. त्यामुळे विविध भागातील डीएड व बीएडधारकांना तात्पुरता रोजगार उपलब्ध होणार आहे.

बेळगाव – शिक्षक बदली प्रक्रिया राबविल्यानंतर अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यभरात पुन्हा दहा हजार अतिथी शिक्षकांच्या जागा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला देखील अधिक प्रमाणात अतिथी शिक्षक मिळण्याची शक्यता आहे. ३१ मेपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक हजारहून अधिक अतिथी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे.
मात्र, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सूचना करण्यात आल्यानंतर शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. तसेच, शिक्षकांनी तालुकानिहाय व जिल्हानिहाय बदली करून घेतली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पुन्हा अतिथी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात २०० हून अधिक जागा भरती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अतिथी शिक्षकांची भरती करतेवेळी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची सूचना करण्यात केली होती. त्यामुळे विविध भागातील डीएड व बीएडधारकांना तात्पुरता रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र, अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यापेक्षा शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

उमेदवारांची उच्च न्यायालयात धाव

राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. काही उमेदवारांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, नवीन शिक्षक भरतीला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्यात नव्याने दहा हजार अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होऊ लागली आहे.

बदली प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर ज्या तालुक्यात रिक्त जागा आहेत. तेथील शाळांची माहिती घेऊन दुसऱ्या टप्प्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात खानापूर, बैलहोंगल व सौंदत्ती परिसरात अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यास प्राधान्य दिले जाईल.

ताजा खबरें