इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता दहावीचा निकाल ८ जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.
पण, ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागेवरच दाखले मिळत आहेत. दुसरीकडे आता जात पडताळणी कार्यालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना एका दिवसात तर अधिकाधिक आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे.
विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे.
वास्तविक पाहता जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कालावधी तीन महिने आहे. तरीपण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून समितीकडून अवघ्या आठ ते दहा दिवसांसांत प्रमाणपत्र दिले जात आहे.
गरजू विद्यार्थ्याचे खरोखर नुकसान होत असल्यास समितीच्या सदस्यांची उपलब्धता पाहून एका दिवसात देखील प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी ते ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहेत, तेथील कागदपत्रे घेऊन समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी तत्काळ अर्ज करावा,असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमाणपत्र न मिळाल्याने कोणाचा प्रवेश रद्द झाला किंवा प्रवेश मिळू शकला नाही, असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता समितीकडून घेतली जात आहे.
‘ही’ कागदपत्रे आवश्यकच…
- संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
- अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा
- अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत
- अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र
- अर्जदाराची आत्या, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला
- अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक)
- वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र).
प्रमाणपत्राअभावी कोणालाही प्रवेशाला मुकावे लागणार नाही.
विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून वेळेत अर्ज करावेत. सुरवातीला समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. त्या अर्जाची स्वॉप्ट कॉपी कार्यालयात आणून जमा करावी. त्याची पडताळणी होऊन संबंधित विद्यार्थ्यास आठ-दहा दिवसांत प्रमाणपत्र देण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने रद्द होणार नाही.
‘या’ बाबींकडे द्या नक्कीच लक्ष…
- ‘एससी’ संवर्गातील विद्यार्थ्याने जात वैधता प्रमाणपत्रासाठी १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
- ‘व्हीजेएनटी’तील विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचे पुरावे जोडावेत
- ‘ओबीसी’ व ‘एसबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे पुरावे देणे बंधनकारक आहे.