गुजरात की मुंबई, कोण गाठणार फायनल? पाहा IPLची आकडेवारी काय सांगते

आकाश मधवालच्या गोलंदाजीच्या जोरावर एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत करून मुंबईने आयपीएल फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकलं.

आता फायनलमध्ये धडक मारण्यासाठी मुंबईला गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. मधवालने 5 धावात 5 विकेट घेतल्या, त्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरातवर 81 धावांनी विजय मिळवला.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्यांदा या हंगामात आमने-सामने येणार आहेत. लीग फेरीत दोन्ही संघात दोन वेळा लढत झाली. यात दोघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला. एकूण आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना झाला असून दोन वेळा मुंबईने तर एकदा गुजरातने बाजी मारली आहे.

आयपीएलच्या प्लेऑफला सुरुवात २०११ मध्ये झाली होती. तेव्हापासून मुंबई इंडियन्स तीन वेळा क्वालिफायर दोनमध्ये पोहोचले असून दोनदा विजय तर एकदा पराभव झाला आहे. २०११ मध्ये मुंबईला क्वालिफायर २मध्ये आरसीबीने हरवलं होतं. तर २०१३ आणि २०१७ मध्ये त्यांनी केकेआर आणि आरसीबीला हरवलं होतं.

जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीतही मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात मोठा विजय मिळवल्यानं इतर संघांना ही धोक्याची घंटा आहे. मुंबईची या हंगामातली कामगिरी चढ-उतारांची राहिलेली आहे. आता मोक्याच्या क्षणी मोठा विजय मिळवल्याने मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला आहे.कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड यांनी आतापर्यंत आव्हानाचा सामना चांगल्या पद्धतीने केला आहे. त्यांच्याशिवाय युवा फलंदाज नेहल वढेरानेसुद्धा चमक दाखवली आहे. तर रोहित शर्मा आणि इशान किशन यांची सलामीची जोडीही त्यांची भूमिका पार पाडत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

गुजरात टायटन्सला पहिल्या क्वालिफायर सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने हरवलं. आता सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.

गुजरातच्या सर्व खेळाडूंनी आतापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. फलंदाज शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी जबरदस्त कामगिरी केलीय. गिलला चेन्नईविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही. पण लीग फेरीतील अखेरच्या दोन सामन्यात शतक केलेला शुभमन गिल मुंबईसाठी आव्हान ठरू शकतो