सत्तासंघर्षाचा निकाल ‘या’ 3 पैकी एका तारखेलाच लागण्याची दाट शक्यता

मुंबई – एम.आर.शाह 15 मे रोजी निवृत्त होत आहेत आणि 20 मे पासून सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी सुरु होतेय. एक स्वाभाविक आहे, की न्यायमूर्ती एम.आर. शाहांच्या निवृत्तीआधीच निकाल लागू शकतो.

आता त्यांची निवृत्तीची 15 तारीख जर लक्षात घेतली आणि इतर तारखा किंवा सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाचं कामकाज सोमवारी ते शुक्रवारपर्यंत चालतं.

10 तारखेला बुधवार आहे….सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरु आहे

11 तारखेला गुरुवार आहे…कामकाज सुरु आहे

12 तारखेला शुक्रवार आहे…कामकाज सुरु आहे

13 तारखेला शनिवार आहे…कामकाज बंद असेल

14 तारखेला रविवार आहे…कामकाज बंद असेल

आता या 5 तारखांपैकी 3 दिवस फार महत्वाचे आहे. 10, 11 आणि 12 तारीख. त्यामुळे या 3 दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे.

निकाल लागेल म्हणजे काय होईल?

ठाकरे गटाची याचिका आहे की, एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करा. तर शिंदेंच्या शिवसेनेची याचिका आहे की, ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र व्हावेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालातली महत्वाची बाब ही असेल की, घटनापीठ प्रकरण कोणाकडे सोपवणार? सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर की तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ? कारण घटनातज्ज्ञांच्या मते, आमदारांना थेट अपात्र करण्याचा अधिकार, सुप्रीम कोर्टाला नाही आणि झिरवळांनी तर स्पष्टच सांगितलंय की, “माझ्याकडे प्रकरण आलं की 16 आमदार अपात्र होणार”.

निकाल जाहीर झाल्यावर नेमकं काय होणार?

प्रकरण कोणत्या अध्यक्षांकडे जाणार हे तर घटनापीठ निकाल देईल त्याचवेळी स्पष्ट होईल. पण समजा जर तरच्या खोलात गेलोच, तर काय होतंय तेही समजून घेऊयात. भाजप-शिंदेंच्या शिवसेनेकडे 164 आमदारांचं संख्याबळ आहे. महाराष्ट्र विधानसभेचं एकूण संख्याबळ 288 आमदारांचं आहे आणि बहुमताचा आकडा 145 आमदारांचा आहे.

आता जर, 16 आमदार अपात्र झालेच तरीही बहुमत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचे असेल. कारण 164 आमदारांमधून 16 आमदार कमी झाल्यास संख्याबळ 148 आमदार इतकं होतं. त्याचवेळी 16 आमदार कमी झाल्यानंतर, बहुमताचा आकडाही कमी होईल. 288 मधून 16 आमदार कमी केल्यावर 272 आमदार होतात आणि बहुमताचा आकडा 137 आमदार होईल. 16 आमदार अपात्र झाल्यावरही शिंदे आणि भाजपच्या शिवसेनेकडे 148 आमदार आहेत. म्हणजेच बहुमत गमावत नाहीत.बहुमताच्या खेळात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची बाजू भक्कम राहिली तरी एक झटका जोरदार बसणार. 16 आमदार अपात्र झालेच तर 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव आहे आणि मुख्यमंत्रीच जर अपात्र झाले तर सरकारच कोसळणार. मात्र बहुमताच्या जोरावर पुन्हा नव्यानं सरकार स्थापन होईल, आणि नवा मुख्यमंत्री कोण असेल? हे भाजपला ठरवावं लागेल.

त्याचवेळी 16 आमदार अपात्र झाल्यानंतर, 16 मतदारसंघात निवडणूका घोषित होतील. कारण कर्नाटकमध्ये 2019 ला, 17 आमदारांना 6 वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. मात्र अपात्र आमदारांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टानं अपात्रता कायम ठेवत, तात्काळ निवडणुकीचे आदेश दिले होते आणि निवडणुका झाल्या.

देवेंद्र फडणवीस यांचं ‘पुन्हा येईल’ वक्तव्य

आमदार अपात्र झाले तरी, सध्याच्या सरकारकडेच बहुमत राहिल, हे विरोधकांनाही माहिती आहे. त्यातच फडणवीसांनीही पुन्हा येईन म्हणत सूचक इशाराही दिलाय. सत्तासंघर्षाचा निकाल अपेक्षित असतानाच, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक लंडनला जाणार आहेत. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात ज्या अॅडव्होकेट हरीश साळवेंनी युक्तिवाद केला, ते साळवेही लंडनमध्येच आहेत.सत्तासंघर्षाला 10 महिने झालेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निकाल काय असेल, याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात. निकालाची आतुरता आठवड्याभरातच संपेल असं सध्या तरी चित्र आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh